नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग सहावरील सुरत नागपूर रस्त्यावरून जळगावहुन सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊ सहा जण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली.
धुळे ते नवापूर दरम्यान विसरवाडी येथे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला आहे. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स घाटातील पुलाखाली कोसळून सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अजून काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
खासगी ट्रॅव्हल्स जळगावहुन सुरतकडे जात असताना बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील पुलाखाली ट्रॅव्हल्स कोसळल्याने भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्स मध्ये साधारण ४० प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी आहेत. रात्री दोन-अडीच दरम्यान हा अपघात घडला त्यावेळी प्रवासी गाढ झोपेत होते.
अपघाताची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजताच ते कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. अपघातग्रस्त जखमींना विसरवाडी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिवाय, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे.
सुरूवातीला बसमध्ये अडकलेल्या जिवंत व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. या अपघातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने विसरवाडीहुन खासगी गाड्यांनी या जखमींना पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते.
सध्या राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा ठरत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होतांना दिसत आहे.